लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

नववर्ष - कोंब फुटलेल्या मेंदूची गोष्ट भाग क्र : ३

नववर्ष

 उगवेल अशीही पहाट कधीतरी

धूळ. प्रचंड धूळ. अवाढव्य धूळ. जिकडे तिकडे सर्वव्यापी सर्वसमावेशक धूळ. टेबलावर, कॉटच्या कठड्यावर, खुर्चीवर, सेट टॉप बॉक्सवर. धुरकटलेल्या आरश्यावर धूळ. लॅपटॉपच्या किबोर्ड वर, चार्जरच्या केबलवर, टीव्हीच्या स्क्रीनवर, कपाटावर धूळ. भिंतीच्या कोपऱ्यात, फ्रिजच्या वर. सेल जाऊन बंद पडलेल्या भिंतीवरील घड्याळावर. खटरखरर करत चालणाऱ्या पंख्याच्या पात्यांवर ठसकनारी धूळ. अस्ताव्यस्त धुळकट धूळ.

आयुष्याची झालेली धूळ धूळधाण धूळ. नाकाच्या चिकट केसात अडकलेली, डोईच्या केसांना जरठराठ करणारी धूळ. भयंकर धूळ. ही धूळ जठरात भरता यायला हवी होती साली. सगळे प्रश्न सुटले असते झटक्यात. तुला धुळीची ॲलर्जी आहे. नाकातून सटासट शिंका येतात धुळीच्या संपर्कात आल्यावर. सटासट अन् फटाफट शिंका यायला हव्यात. शिंकता शींकता नाकातून मेंदूच बाहेर यायला हवा. सटकन. त्या कोपऱ्यात कोळ्याने केव्हढ जाळं विणलं. काय फसलं त्यात? पतंग? तुरुतुरु धावत येणारा धुळरंग्या कोळी. भक्ष्य पोटात जायच्या अगोदरच त्याला विरघळून टाकणारा कोळी. पोटात जायच्या अगोदरच पचन सुरू साला. 

टीचभर कोळी पैश्या एव्हढा होतो मग भिंतीवरल्या गोल घड्याळा एव्हढा मग बैलगाडीच्या चाका एव्हढा मग घरा एव्हढा मग आभाळा एव्हढा. अवाढव्य कोळी. प्रचंड अवाढव्य कोळी. थुंकतो तुमच्यावर चिकट होऊन जाता तुम्ही अन् जळायला लागता आधी वरचं मांस गळायला लागतं मग हाडं विरघळू लागतात मग अवाढव्य जबडा उघडुन कोळी तुम्हाला उदरात घेतो भाजत्या अंगान तुम्ही गडप होता त्याच्या पोटात.

बेसिनमध्ये भांडे तसेच पडलेत. चहाचं भांड वाळूनकोळ झालं. करपट केशरी पत्ती तशीच आहे चाळणीत. चाळणीवर पण धूळ. परवा सकाळी केलेल्या ऑमलेटचा तवा तसाच आहे. मचुळ वास येतोय प्लेट अन् सरेट्याचा. अंड. अंड्यातला जीव ऑमलेट होऊन पोटात. पोटातल्या ऑमलेटच परत अंड व्हावं. टणक कवच असलेलं अंड. मग त्याचा आकार वाढत वाढत जावून भसकन ते अंड पोट फाडून बाहेर यावं. भसकन सगळे आतडे बाहेर. 

किती दिवस झाले संडास घासला नाही हारपिक असून. पिवळे डाग पडलेत शिटवर. दाग अच्छे होते है. झाटाचे आच्छे  होते है. तिरमिरी येऊन उठावं अन् हाती फडका घेऊन ही सगळी धूळ झाडून टाकावी. खसखस संडास घासावा. लख्ख करून टाकावं धूळ भरलं आयुष्य. धुळीत मिसळायचं नसेल तर..,

लख्ख उजळलेली धुळविरहित सकाळ उगवावी उद्याची. दवभरलं मंद्रमंजुळ हलकं धुकं असावं आसमंतात अन् वर जर्दजहाल हसणारा तेजस्वी सूर्य.

उगवेल अशीही पहाट कधीतरी..

- महेंद्र गौतम.

गोष्ट मुंबईची : मुंबई चे जीवन

गोष्ट मुंबईची

गोष्ट मुंबईची, मुंबई भिनत जाते तुमच्यात लोकल वाहत राहते रक्तातून. उर दडपवणाऱ्या राक्षसी गर्दीचा तुम्ही केंव्हा भाग होऊन जाता कळत पण नाही. परवा घाईत नेमका लगेजच्या डब्ब्यात घुसलो तिथे एक ग्रुप हसत खिदळत चाललेला. खदखद हसवणारे जोक्स, पटकन दोस्ती झाली म्हटल सगळेच एका जागी जॉब करता का? सगळे हसले "नाय रे सगळे वेगवेगळ्या जागी आहेत पण 11 वर्षापासून एकाच ठरलेल्या डब्ब्यात मग जुळतात ऋणानुबंध तू पण येत चल हां". दादर कधी आल कळल पण नाही जातांना खांद्यावर थोपटून डोक्याला कुरवाळत बाय..,

संध्याकाळी साईट संपवून परतत असतांना डब्ब्यात हातात पिशवी घेऊन डोळे मिटून ध्यानस्थ मुन्यासारखा वाटणारा,भरगच्च काळ्यापांढऱ्या दाढीचा, अर्ध चमचमणार टक्कल असलेला एक माणूस.. त्याने एक स्टेशन जाऊ दिल आणि पिशवी सावरत अचानक गाऊ लागला  " एक दिन बिक जाएगा माटी के मोल जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल.." मी मुकेशचा एव्हढा मोठा फॅन नाही तरी त्याच वावड देखील नाही मुड आलाच तर कधी चांदसी मेहबूबा किंवा चंदनसा बदन ऐकतो पण गाणाऱ्याच्या आवाजात बात नक्कीच होती तो तल्लीन होऊन गात राहिला  कुणास ठाऊक कशी पण तंद्री लागली कुणीतरी बोट धरून भुतकाळात घेऊन गेल्यासारख वाटल मधली पाच सहा वर्ष गळून पडली तेंव्हा लाथाडलेली चांगल्या पॅकेजची नोकरी गमावलेले  काही लाख, हातात दोन पुर्ण पुस्तक आणि दोन अर्धवट सिनेमे,आत सगळा कोलाहल माजला, स्वप्नांच्या माग ऊर फाटेस्तोवर धावण आठवल.

मस्त आलाप घेऊन तो त्या दरवाजातून या दरवाजात आला जणू त्याचा  स्टेज परफोर्मन्स सुरुये असा, नेमका माझ्याजवळ. आपसूक हात खिशाकड वळला आणि त्याने खांद्याला थोपटून मला थोपवल अधूर गाण पूर्ण केल..

"पैसो के लिए नहीं गाया दोस्त. भगवान की दया से दो चाल और तिन टैक्सीया चलती है इस गरीब की मुंबई में. 55 साल पहले एक ख्वाब लेकर लखनऊ से यहाँ आया था बस भूक ने वो ख्वाब निगल डाला मायानगरी तो हमें रास नहीं आयी.. अभी कभीकभार ऐसे ही कलाकार होने की खुजली मिटा लेता हू " त्याच्या डोळ्यात कसलीतरी अभिजात अस्वस्थता दिसली " पिशवी सावरत तो पुढच्या स्टेशनवर उतरून गेला, त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत मला "सं.भा."च्या ओळी आठवल्या,


"उरात होती स्वप्ने आणिक
स्वरात होते गाणे
कुठे जायचे होते
आले कोठे पाय दिवाणे."

-महेंद्र गौतम


  • हे देखील वाचा

एक झाड - हिरवेपण कुणीच हिरावू शकतं नाही..

झाड

हिरवेपण कुणीच हिरावू शकतं नाही.. 

एकदा गावच्या डोंगरावर भटकतांना मला एका भल्यामोठ्या दगडावर एक झाड

उगवलेलं दिसलं, जवळ जाऊन बघतो तर गंमतच होती. अगदी जराशीच माती त्या

दगडावर, कुठूनतरी येऊन ते बिजं त्यात रुजल असावं.

 मी विचार केला या झाडाचं आयुष्य किती?

पण एकाएकी तरारुन आलेल्या त्या हस-या झाडाचं हिरवेपण बघून अगदीच रोमांचीत

झालो. कदाचीत ते झाड म्हणत असावं दगडाशी झुंजून थकेस्तोवर तरी भरभरायचं

नंतर भलेही सुकून जाऊ..

रुजण्यापूरती माती आहे, हवा आणि ओल आहे मग कशाची वाट बघायची? चला रुजुयातं...

खरतरं पानगळ कष्टप्रदच. अश्या पानगळीच्या काळात सोबतीची पाखरंही उडून

जातात, ज्याची त्यानेच सोसायची असते भयाण पानगळं.

एखादा सामान्य माणूस किंवा नावाजलेल व्यक्तिमत्व प्रत्येकालाच पानगळीतून

जावं लागतंच. पण तश्या विदीर्णावस्थेत स्वतःला टिकवुन ठेवणं उद्याच्या

बहराची वाट पाहत त्या असह्य झळा सोसत जाणं. जिकीरीचच कामं. पण तश्या

एकाकीपणात कुठूनतरी चार दवाचे थेंब मिळतात अन् नवपालवीच स्वप्न अजून गर्द

होत जातं..,

पूर्वी ढ कॅटॅगिरीत मोडल्या गेलेला आणि आता मात्र स्वतःच्या गावची अख्खी

बाजारपेठ काबिज करणारा माझा एक चिक्कार यशस्वी मित्र..

मध्यंतरी त्याला भेटायचा योग आला त्याचे शब्द अजून रुंजी घालतात. "आयला

काहिच नव्हत रे हातात हिंमतीशीवायं..!!

आज तो ऐन बहरात आहे पण त्यानेही पानगळ सोसलीच ना?

शेवटी ज्याच्यात कळा आणि झळा सोसायची धम्मकं आहे त्याच हिरवेपण कुणीच

हिरावू शकतं नाही.. ,नाही का ?


- महेंद्र गौतम



रविवार ची सुट्टी - जीवनाचा अनुभव

रविवार

ऑफिसची बॅग पाठीवर लटकवून सुन्नाट दुपारी उगीच पायी भटकतोय आज,यात विचित्र गोष्ट अशी की आज रविवार आहे. काही दिवस अगोदर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असायचा आता सुट्टी म्हटलं की भीती वाटते. पोटात काहीच नाही. दीड वाजला दुपारचा. सूर्य महोदय त्यांचं आग ओकण्याच काम इमानदारीने करतायत. सकाळी चहा घेतला होता, आता पण घेतला. तंबाखू मळली गोळी दाढेत धरली. आता काय करायचं? काहीच नाही. पायांची आग होतेय. मस्तकातून गरम वाफा येतायत. बगलेत दमट घाम. पुढे एक म्हातारी भेटली, तिला आधी सुट्टे पाच रुपये दिले.ओलांडून पुढे गेलो, परत माघारी आलो जीन्स चे खिसे धुंडाळले दहा विसच्या दोन तीन नोटा निघाल्या तिच्या हातात दिल्या, म्हातारीने नोटा हातात घेऊन कपाळाला लावल्या. डोळ्यात नवजात वासराचे भाव तिच्या. क्षण दोन क्षण थांबलो मग मागच्या खिशातून पाकीट काढलं पाचशेच्या दोन शंभराच्या तीन एक दोनशेची नोट निघाली. सगळे पैसे तिच्या पुढे धरले, म्हातारी कावरी बावरी झाली मानेनच नको म्हणाली. मी जबरदस्ती तिच्या हातात सगळे पैसे कोंबले अन् झटक्यात निघालो वळून न बघता. म्हातारी बघत राहिली अवाक होऊन, मला न पाहता दिसलं ते. सगळे पैसे तर दिलेत की आपण म्हातारीला मग थंड का वाटत नाही अजून आपल्याला?? आता चहा लागला तर? बसच भाडं? पुढे चालत राहिलो तसाच. एक हॉटेल शेजारी दारूच दुकान मळकट अंगाचे दोन तीन देशप्रेमी फुटाणे खारदाणे वाल्याकडून घेत आहेत काहीतरी. तिघेही डुलताहेत मस्त. बाजूला हिरवं टीशर्ट घालून खाली पांढरा ढगाळ मळकट पायजामा घातलेला म्हातारा बसलाय पायरीवर. कपाळाला अष्टगंध लावलेला, सुस्नात, केसांना तेल चोपडून मस्त भांग पाडलेला पांढऱ्या खुरट्या दाढीचा, माळ घातलेला म्हातारा. त्याच सगळं लक्ष त्या वाईन शॉपकडं. त्याच्या डोळ्यात तहान दाटलेली दिसतेय आणि चेहऱ्यावर हतबलता. ते तीन कळकट मळकट देशप्रेमी त्याच्या जवळ आलेत अन् झिंगत हसत आम्हाला आशीर्वाद द्या बाबा म्हणत हातातले फुटाणे त्याला देऊन पायातली चप्पल काढून पटापट त्याच्या पाया पडायला लागलेत एकाएकी. गंमत च्यायला नुसती. पोटात दारु गेली की अवघ्या जगण्याची गंमत होऊन जाते.

आता चालून थकलोय अस वाटायला लागलं. मग मी खिशातून मोबाईल काढला. तर त्यात निशा फ्रेंडशिप क्लब दोस्त बनाये वाला मेसेज येऊन पडलेला. उडवला. ओला ॲप उघडलं डेस्टिनेशन टाकलं. तीनशे एंशी रुपये. बुकिंग केली. पाच मिनिट लागतील गाडी यायला. बसने गेलो असतो तर पस्तीस रुपये तिकीट लागलं असतं पण आता काय करू पैसे वाचवून. जे वाचवायला पाहिजे होतं ते वाचलं नाही अपल्याच्यान अन् कुजक्या नोटा वाचवून काय करायचं. लेकरू वाचायला पाहिजे होतं आपलं. किमान या जगात यायला तरी पाहिजे होतं पण. पण पण पण.. गपकन कळ उठली छातीत श्वास वाढला कानाशिल तापली बांध फुटून रडायला येतंय खूप अस वाटायला लागलं. पण फोन वाजला तसा भानावर आलो. सर रोड के इस साईड आईये. गेलो. कॅबचा दरवाजा उघडला एसी बंद करून काचं वर केले अन् बसून राहिलो. सिग्नल लागला अन् धावणारी गाडी थांबली. फटफट टाळ्यांचा आवाज करत एक किन्नर थांबलेल्या गाडीजवळ आला, दोन टाळ्या वाजवून माझ्यापुढे हात करत मला 'दे रे चिकने' म्हणाला. मी पॉकेट काढलं पण ते ठणठण रिकामं. कूछ भी नहीं है दीदी मी खजील होत त्याच्या समोर पॉकेट धरलं. मंद हसला तो. किंचित सजल झाले त्याचे डोळे. मायेने माझ्या दोन्ही गालावरून तळवे फिरवले त्याने. डोक्यावर हात ठेवून काहीतरी पुटपुटला डोळे बंद करून. मग दातात एक रुपयाचं नाणं धरून डोक्यावर पदर घेत परत काहीतरी डोळे मिटून पुटपुटला तो आणि ते नाणं मला देत बोलला इसको कभी खर्च नही करना. त्याने परत माझी हनुवटी एका हाताच्या ओंजळीने गोंजारली अन् अल्ला मेरे बच्चे को खुश रखना हमेशा म्हणून लगबगीने निघूनही गेला. नाकात त्याच्या हलक्या फाउंडेशन अन् पावडरीचा वास रेंगाळला अन् कानामनात त्याचे शब्द मेरा बच्चा..

पहिला पाऊस : पहिली भेट.

पहिला पाऊस आठवतो का? 

पहिला पाऊस
पहिली मिठी पहिला किस आठवतो का?  

तुला आपला पहिला पाऊस आठवतो का? 

एक अडवळणाची वाट होती कॉलेजची. 

वाट बघत थांबायचीस तो क्रॉस आठवतो का?

 लालजर्द पेरू सारखं ओठांवरच गोड हसू..

आसपास असल्याचा गर्द आभास आठवतो का? 

व्हॅलेंटाईनच एक गुलाब कॉल्ड कॉफी विथ हॉट ब्राउनी.

 पिझ्झाच्या टॉपिंग वरला तो सॉस आठवतो का? 

अवेळीच बहरलेल्या चंद्रमधुर अधीर रात्री..

 रोम रोम रोमांचित अन् मोगरा श्वास आठवतो का? 

होऊ नये होतात वाद सुटू नयेत पण सुटतात हात..

अधुरल्या स्वप्नाचा एक अधुरा प्रवास आठवतो का? 

तुला आपला पहिला पाऊस आठवतो का ???

 ११ नोव्हेंबर.. 

                                            - महेंद्र गौतम 


  • हे देखील वाचा ✅

  1. एव्हढं करशील माझ्यासाठी???
  2. जराशी सांज ढळतांना..


झरा जिवंत असावा - : घनगर्द तमातील मिणमिण

झरा जिवंत असावा

झरा जिवंत असावा - सलग दोन तीन महिने खच्चून काम होतं.

झरा जिवंत असावा

सलग दोन तीन महिने खच्चून काम होतं ऑफिसचं,आळंदी - देहू नावाची शेवटची गाडी घरी यायला फाट्याहून पकडायची. घर आठ दहा मिनिटांवर, दुसराच स्टॉप म्हणून बसमध्ये जाऊन पुढे उभं राहायचं. त्यात एका परटिक्युलर सीटवर कायम ती बसलेली. काटकुळी, विझलेले डोळे,सावळा निस्तेज चेहरा लौकिकार्थाने असुंदर. अंगावरचे कपडे थोडेसे जुनाटच गरिबी दाखवणारे. आसक्त नजरेने सतत भिरभिर बघत राहायची. मागे उभा असलो की सतत वळून बघत असायची अन् मी मनात हसायचो. उतरल्यावर पण खिडकीतून तिचं बघणं पाहून गंमत वाटायची. मनात म्हणायचो पुरुषाची नजर बाईला कळते तशीच बाईची नजर पण कळत असते पुरुषाला मावले. बिक गया जो वो खरिदार हो नही सकता..

झरा जिवंत असावा - नंतर कामाचा भार. 

इंद्रायणी घाट
नंतर कामाचा भार ओसरला अन् घरी लवकर येणं व्हायला लागलं. रोजच्या आयुष्यात ती नजर विस्मृतीत गेली. अचानक शनिवार रविवार धरून शुक्रवारी रात्रीच जिगरी दोस्त येऊन धडकले भेटायला. सगळं अनियोजित म्हटलं आता आलाच आहात तर 'ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी' या नावाचे जिनियस जवळच असतात, हाकेच्या अंतरावर भेटवून आणतो तुम्हाला. बावाजी तुकाराम बोल्होबा आंबिले थोडेसे दूर असतात त्यांचं पुढे बघू. एकतर या लाटांमुळे भेटणं दुरपास्त म्हणून तब्बल दोन वर्षांनंतर आलेले काळीज यार. जाम खुशीचा दिवस,आळंदी पोचलो, तिथल्या इंद्रायणीच्या काठावर बराच वेळ रेंगाळत राहिलो. शंभर वर्षांपूर्वी किती नितळ स्वच्छ असेल हे इंद्रायणीचं हिरवट पाणी? हा घाट किती शे वर्षांपूर्वी बांधला असेल? असलं कायबाय बोलत प्रत्येक जुन्या गोष्टीला हात लाऊन पाहत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलो. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या माणसाबद्दल नाही म्हटलं तरी सोबत्यांना पण आदर होताच. आत गेलो संजीवन समाधी डोळाभर बघत भारावून सगळं डोळ्यात साठवणाऱ्या दोस्तांसोबत मागच्या बाहेर नेणाऱ्या प्राचीन दरवाजात आलो अन् समोर प्रसाद अन् इतर वस्तू असणाऱ्या दुकानात माऊली प्रसाद घ्या म्हणणारी मलूल डोळ्यांची ती.!! चमकून माझ्याकडे दोन क्षण बघत राहिली पण यावेळी ती बसमधली नजर नव्हती तिची. दोन वर्षांपासून जिथे दिवसाला काही हजार लोक यायची तिथे आता शे तीनशे लोकं पण येणं मुश्किल,त्यात मध्ये किती तरी महिने कडकडीत बंद म्हणून आता जो तो दुकानदार काकुळतीला येऊन माऊली हार घ्या, माऊली चप्पल इथे काढा, माऊली हे घ्या ते घ्या माऊली म्हणत आधीच काळजाला चरे पाडत होता. सोबतचे दोस्त आपल्यासारखेच दर्शन हार प्रसाद अबीर वगैरे गोष्टींना अजीबात महत्व न देणाऱ्या पंथातले. मी रेंगाळलो अन् तिला विचारलं एक पाकीट कितीला? वीस म्हणाली. तिच्या हातातली दोन्ही पाकीटं घेतली, पन्नासची नोट देऊन उरलेले दहा ठेव म्हणालो तिनं लगबगीने दहाची नोट काढून हातावर ठेवली अन् एकाएकी तिचं फोन वर कुणाशी तरी झालेलं बोलणं आठवलं. म्हणजे मागच्या लाटेत गेले ते हीचे वडील. त्यांच्या पश्चात ही दुकानात येते म्हणजे जबाबदारी या एवढ्याश्या जीवाने घेतलीय घराची. रोज भल्या पहाटे सकाळच्या पहिल्या बसने येत असणार आणि रात्रीच्या शेवटच्या बसने जाते. मला दणकन भरून आलं. तिचा निस्तेज चेहरा हजार चंद्राच्या प्रकाशाने उजळलेला दिसला.मलूल डोळ्यात जगण्याची पाणीदार आशा दिसायला लागली. खर सांगतो त्यावेळी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री समोर उभी होती माझ्या. वाटत होतं तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवावा अन् गालाला एक उबदार घनघोर प्रेमाने ओथंबलेला स्पर्श करावा तिच्या..

तिकडे आत विश्रांती घेणारे एक भिंत चालवून कीर्ती दिगंतात गेलेले माऊली आणि इकडे चार भिंतींच घर चालवायला धडपडणारी ही माऊली आणि समोर तेंव्हाही अन् आताही वाहणारी संथ हिरवट पाण्याची इंद्रायणी माऊली..


"नदी पाऊल मिटते 
नको त्याचा गवगवा
बाई डोहाच्या ग आत
झरा जिवंत असावा.."


- महेंद्र गौतम.

भाजी विकणारी म्हातारी.

मराठी कविता - भाजी विकणारी म्हातारी

सुरकुतलेली भाजी घेऊन
भगभगलेल्या सुन्न दुपारी
झाडाखाली बसली असते
चुरगळलेली एक म्हातारी.


सुस्तसे कांदे लसूण मेला
मरगळलेला एक भोपळा
तीव्र उन्हाने करपून गेला
मटकीचाही कोंब कोवळा.


रंग उडालेली कोथिंबीर
म्हातारीची वदे कहाणी
अलगद निरपून काढत असते
डोळ्यांमधले उदास पाणी.


विकत बसते दिवस दिवसभर
पुढ्यातली ताजी तरकारी
चावत बसते भूक लागता
ठेच्या संगे शिळी भाकरी.


ठिगळ लावलेले एक लुगडे
उसवलेली एकच चोळी.
तरी हासते ग्राहक येता
म्हातारी ती साधी भोळी.


छळती मजला जीर्ण ते डोळे
ओठांवरचे हास्य कोवळे
किती भोगले असतील आजवर
दुःखाचे तिने खिन्न सोहळे.


मी म्हटले का धडपडते माई
विकत असतेस काहीबाही
भीक मागण्यापरीस म्हणे ती
भाजी विकणे वाईट नाही..!


महेंद्र गौतम.

  • हे देखील वाचा
  1. घनगर्द तमातील मिणमिण.
  2. जिंदगी तुझको धुंडती है अभी.
  3. देह नाजूक साजूक

स्मित - कुणीतरी मंद हसतांना दिसतय का?

स्मित

माणसं उभारत आहेत मनोहर मनोरे
जीवनदायीन्या नद्यांच्या काठी.
माणसांनी वितळवायला दिल्यात
बंदुका गुप्त्या आणि तलवारी,
विळ्या फावडी अन् टिकावं करण्यासाठी.

माणसं घालतायत मुंग्यांना साखर
अन् देतायत भुकेल्यांना भाकर.
उगारत नाहीयेत काठी फुत्करणाऱ्या नागावर
किंवा ठेचत नाहीयेत नांगी,
जहर जहाल गर्द काळया विंचवाचीही.

कडक उन्हाळलेल्या चोची घेऊन 
हिंडणाऱ्या हवालदिल पाखरांसाठी
माणसं मांडून ठेवतायत रस्तोरस्ती
गार मडक्यात थंड पाणी,
जाळून टाकल्यात त्यांनी आपापल्या गुलेरी.

उचलून घेतायत माणसं कुठल्याही
माणसाचं रडणारं अश्राप मुलं.
माणसं बेभान प्रेम करतायत माणसांवर
आपले आणि इतर असा भेद न करता,
अडीच हजार वर्षां नंतर दूर कुठेतरी
कुणीतरी मंद हसतांना दिसतय का?

-महेंद्र गौतम.


  • हे देखील वाचा

का? - आपण असंच मरायचं का?

विद्रोही कविता

ते टिपून मारतील
आपण असंच मरायचं का?
ते जिवंत जाळतील
आपण असंच जळायचं का?

किती युगांची आहे
त्यांची रक्ताची तहान तरी
नरड्यात सुळे खुपसतील
आपण असंच किंचाळायचं का?

ते आळीपाळीने बलात्कार करतात
भोगल्यावर प्रेत झाडाला टांगतात
मुजोरीने विकट हसतात
आपण भेदरून पळायचं का?

मस्तकाच्या होतील ठिकऱ्या
अन छातीचा होईल बुकना
ते राजरोस छातीवर नाचतील
आपण असंच हळहळायचं का?



-महेंद्र गौतम.


कातीन आणि वाघीण.

लहानपणी आजी सांगायची कहाणी कातीन अन वाघिणीची.
पैश्याएव्हढी कातीन घालायची अंडी,
अन अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सुटायची खावं खावं.
जेंव्हा संपायचं जाळ्यातलं अन्न 
तेंव्हा कातीन स्वतः वाढून द्यायची स्वतःच शरीर पिलांसमोर.
पिलांना वाचवण्यासाठी खुशीने जायची मरून.
वाघीण जेंव्हा जनायची तीन चार पिलं तेंव्हा प्रसूतीच्या शीणवट्यामुळं भगभग करणाऱ्या पोटाला शांत करण्यासाठी खायची एखादं दुसरं पिल्लू तिचं.
यातलं खरं खोटं कुणाला ठाऊक?
पण आताशा मला तुझ्या अंगावर काळपट पिवळे चट्टे का दिसतायत??

महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected