तो दिलफेक, काळजात वाहतं गाणं असणारा, कविता गझलेत जगणारा. जवळून गेला तर घमघमत्या सुगंधाची झुळूक सोडणारा... दिल दर्या त्यामुळे आजूबाजुला चिक्कार दोस्त. त्यात कलाकार म्हणून गॅदरिंगा गाजवणारा.. त्याच्या जगण्यात एक चव होती त्याच्या जगण्यात एक लय होती,फुलांची बात होती, अत्तराची रात होती.
ती साधी,बिचारी नकळत ओढल्या गेली,गुरफटली आणि आपसूक विस्कटली. जाणूनबुजून विस्कटण्याचेच दिवस ,त्यात तो वेडा जीव लावला तो लावला मग कश्याचीच तमा नाही कुठल्याच गोष्टीला सिमा नाही.. गोष्ट सुरु झाली बरीच पुढे गेली सगळेच खुश होते, हेही खर होतं, कॉलेजची धुंदी आयुष्य बर होत...
आता कॉलेज संपेल मग अस अस करायचं सोबतीन जगायचं नी सोबतीन मरायचं. मरायची गोष्ट कुठून आली रडवेली ती पुसायची तो जरासा हसायचा ती वेडी रुसायची.
रुसण्यातही गम्मत होती मनवण्यात तर जम्मत होती....
एकाएकी विपरीत घडल पाठीवरती आभाळ पडल.. आयुष्याने घात केला त्याचा बाबा सोडून गेला. आयुष्य बदलवणारा मृत्यु, सैरभैर झालेलं घरट, चिनभीन पिलं, त्यात हाच मोठा आईला आधार. आई बोलली वडिलांच्या जागी नौकरी धर पाठच्या भावंडांच शिक्षण पूर्ण कर. उध्वस्त जरी जग होत त्याला सावरण भाग होत.
तो बोलला फक्त एकदाच जाऊन येऊ दे, वाट बघत असेल ती,डोळाभर बघून घेऊ दे.
तिला सगळ समजाऊन सांगेन, शाहणी आहे ती माझ्यासाठी थांबेल.
ते भेटले त्यानं सगळ सांगीतल. तिही राजी झाली तू हाक देशील तेंव्हा धावत येईल म्हणाली. तिला मागे सोडून तो परतला विस्कटलेल घरट सावरायला लागला. एक प्रवास सुरु झाला, कल्याण ते सीएसटी, ऑफिस, खर्डेखशी, चुकलेली एसटी...
तिची पत्र यायची खुशाली कळायची. याच गाण विरुन गेलं,जगणच हरवलेल.
एकदा तिच पत्र आलं, मला येऊन घेऊन जा.
त्याच काहीच उत्तर नाही, लोकभयान आईन पत्र त्याला दिलच नाही.
कधीतरी त्याला समजल कधीचच तिचं लग्न झाल.
खिन्न हसला जरासा तक्रार केली नाही, सुखानं जगावं तिनं जरी माझी झाली नाही.
पुढे चालून कधीतरी त्याचही मग लग्न झालं, हिरवा चुडा घालून हाती, आयुष्यात कोणी आलं. मोठ्या मनाची होती ती सांभाळून घेतलं त्याला, हळूहळू तोही मग पूर्वीसारखा फुलून आला. दोन गोजिरवाणी फुलपाखर पुन्हा आयुष्याच सुरु चक्र...
दरम्यान वर्षाच्या ठरावीक दिवशी, त्याच्या गावावरून तिची गाडी जायची. कसा कोण जाणे पण कळायच त्याला, सिट नंबर डब्बा नंबर अगदी सगळच.
पाच मिनिट गाडी थांबायची, डोळ्यांनीच ती बोलून घ्यायची.
मध्ये पुन्हा तो जगायला लागला कवितेसाठी जागायला लागला. नाटकाला त्याच्या पारितोषिकही मिळालं. आयुष्य सुरळीत सुरु झालं.
तिशी सरली तो पस्तिशीत आला, आणि कच्छचा भूकंप झाला. कच्छमध्ये तिचं घर, याचा जीव पुन्हा टांगणीवर.. खाण्यात लक्ष नाही पिण्यात लक्ष नाही. ठंड उसासे कशातच काही नाही.
उदास बसलेला असतांना बायको जवळ आली मी बॅग भरलिये तुम्ही जाऊन या म्हणाली, एकदा डोळ्यांनी तिला पाहून या म्हणाली. तिनं उबदार हात त्याच्या हातावर ठेवला लागबगिने तोही निघाला..
गुजरात-कच्छ सगळीकडे ढिगारेच ढिगारे.. एका ढिगाऱ्यासमोर ती विमनस्क बसलेली दिसली, याच्याकडे पाहून चकीत हसली..
नवरा नव्हता जवळ ,ख्याली खुशाली विचारुन झाली. बॅग बायकोन भरलिये ऐकून नशीबवान आहेस म्हणाली.
चाळीशी कधीच पार झाली.
आजही ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी ठरावीक प्लेटफार्मवर तिच्या गाडीची वाट पाहत तो उभा असतो...
फरक एव्हढाच आता सोबत बायकोही असते...
महेंद्र गौतम..