लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

मसाप निवडणूक

2012 मध्ये माझा पहिला संग्रह प्रकाशीत झाला होता 'अर्घ्यदान'. मला वाटल संग्रह चार जाणत्या लोकांना दाखवून अभिप्राय घ्यावा, त्यांच मार्गदर्शन घ्याव जेणेकरून उणीवा समजतील, लिखाणाची दिशा स्पष्ट होईल. आपल काही चुकतमाकत असल्यास तेही समजेल.  म्हणून कित्येकांना स्वखर्चाने पुस्तक पाठवल, मसापमधल्या लोकांचे नंबर मिळवले. पहिला कॉल केला....
"हैलो सर मी महेंद्र बोलतोय.
बोला.
सर मला जरा तुम्हाला भेटायला यायच होत.
कश्यासंदर्भात???
नुकताच माझा काव्य संग्रह प्रकाशीत झालाय थोडस मार्गदर्शन हव होत.......
नाहीहो हातावर काम पडलीत वेळच नाही सध्या..
बर तुम्हाला जेंव्हा वेळ असेल तेंव्हा येतो तुम्ही फ्री झालेकी.....
नाही हो एवढ्यात काही जमणारच नाही...
बर जेंव्हा जमेल तेंव्हा........
ते मी कस सांगू???? ठेवतो.....
फोन कट.
परत दुसऱ्या कोणाला फोन करण्याची हिम्मत नाही झाली एवढा जबरदस्त हिरमोड झाला..
"अनावर"च्या प्रकाशनाच्यावेळी "दासु" बोलत होते संग्रह वाचताना मला प्रश्न पडला की महेंद्र गौतम हे नाव मी यापूर्वी ऐकल कस नाही? या कविचा एक संग्रह येऊन गेला तरी आपण त्याच पुस्तक वाचल कस नाही.. मला ओरडून सांगावस वाटल सर तुमच्यापर्यन्त येण्याच धाडसच झाल नाही.....
दूसरी बाजू अशी की काहिच्या काही लिहून त्याच कौतुक व्हाव असा अट्टहास करणारे लोक सुद्धा  बरेच येऊन गेलेत आयुष्यात किंबहुना कितीतरी जणांची पुस्तक न वाचता मी स्वतः अडगळीत फेकलीत एव्हढ डोक्यात जात काही जणांच लिहीन... मग अश्यावेळी प्रस्थापित नवोदितांना डावलतात अश्या बोंबा का मारायच्या उगाच???
सांगायचा मुद्दा एव्हढाच की मसापची रणधुमाळी सुरु आहे बदल करू, परिवर्तन करू अश्या हाकाट्या ऐकू येताहेत.. काही भेंडी बदल घडणार नाही.. एक कळप जाऊन दूसरा कळप येईल एव्हढाच काय तो झाला तर बदल होईल.. मग तेच थोर कवी तेच थोर लेखक त्याच महान लोकांनी मायमराठी वाचवण्याचा घेतलेला वसा प्रत्येक पत्रिकेवर त्याच कळपशील लोकांची नाव... तेच नवोदितांना अन्नुलेखान मारण... तेच तेच सगळ....
तरिपण मी मतदान करणार आहे दोन्ही गटात काही चांगली माणस नक्कीच आहेत मी गट न पाहता त्या माणसांना मत देणार आहे...
आणि सगळ्या प्रस्थापितांना फाट्यावर मारून आपल गुपचुप जे सुचेल ते भलबूर लिहित बसणार आहे....

महेंद्र गौतम.

आत्ममग्न कविता 4

आत्ममग्न कविता 4...

माझ्या गावावरुन कधी तुझी वाट गेलीच
तर माझ्याकड नक्की येशील ना?
भाबड्या पाणीदार डोळ्यांनी म्हणालीस खरी
पण वेडीच आहेस..
तुला माहितेत माझ्या प्रवासाच्या विचित्र वेळा
ज्या तुला कधीच झेपल्या नाहीत
मुळात मी तरी तुला कुठे झेपलो??
आणि तुझ्या थिंकिंग बिगवाल्या नवऱ्याला तर अजिबातच नाही...
मेहंदीभरल्या हळदओल्या हातांनी
जेंव्हा त्याच्याशी ओळख करून दिलीस
तेंव्हा तो म्हणाला होता "मला नाइन पॉइंट टिंग टिंग पैकेज आहे"
तू किती कमावतो??
मिहि जरा विक्षिप्त बेफिकीर सुरात बोललो
जास्त नाही पण माझी एक कविता करोडोच्या घरात असते....
तेंव्हा विचित्र भेदरून बघत राहिला तो
मी स्टेजवरुन उतरेपर्यंत....
तुझा जिव्हाळा कळतो गं
पण असू दे...
वादळ सोसणार नाहीत आता तुला...

महेंद्र गौतम.

डायरीच पान

मुंबई भिनत जाते तुमच्यात लोकल वाहत राहते रक्तातून. उर दडपवणाऱ्या राक्षसी गर्दीचा तुम्ही केंव्हा भाग होऊन जाता कळत पण नाही. परवा घाईत नेमका लगेजच्या डब्ब्यात घुसलो तिथे एक ग्रुप हसत खिदळत चाललेला. खदखद हसवणारे जोक्स, पटकन दोस्ती झाली म्हटल सगळेच एका जागी जॉब करता का? सगळे हसले "नाय रे सगळे वेगवेगळ्या जागी आहेत पण 11 वर्षापासून एकाच ठरलेल्या डब्ब्यात मग जुळतात ऋणानुबंध तू पण येत चल हां". दादर कधी आल कळल पण नाही जातांना खांद्यावर थोपटून डोक्याला कुरवाळत बाय...

संध्याकाळी साईट संपवून परतत असतांना डब्ब्यात हातात पिशवी घेऊन डोळे मिटून ध्यानस्थ मुन्यासारखा वाटणारा,भरगच्च काळ्यापांढऱ्या दाढीचा, अर्ध चमचमणार टक्कल असलेला एक माणूस.. त्याने एक स्टेशन जाऊ दिल आणि पिशवी सावरत अचानक गाऊ लागला  " एक दिन बिक जाएगा माटी के मोल जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल.." मी मुकेशचा एव्हढा मोठा फॅन नाही तरी त्याच वावड देखील नाही मुड आलाच तर कधी चांदसी मेहबूबा किंवा चंदनसा बदन ऐकतो पण गाणाऱ्याच्या आवाजात बात नक्कीच होती तो तल्लीन होऊन गात राहिला  कुणास ठाऊक कशी पण तंद्री लागली कुणीतरी बोट धरून भुतकाळात घेऊन गेल्यासारख वाटल मधली पाच सहा वर्ष गळून पडली तेंव्हा लाथाडलेली चांगल्या पॅकेजची नोकरी गमावलेले  काही लाख, हातात दोन पुर्ण पुस्तक आणि दोन अर्धवट सिनेमे... आत सगळा कोलाहल माजला..  स्वप्नांच्या माग ऊर फाटेस्तोवर धावण आठवल.....
मस्त आलाप घेऊन तो त्या दरवाजातून या दरवाजात आला जणू त्याचा  स्टेज परफोर्मन्स सुरुये असा, नेमका माझ्याजवळ. आपसूक हात खिशाकड वळला आणि त्याने खांद्याला थोपटून मला थोपवल अधूर गाण पूर्ण केल..
"पैसो के लिए नहीं गाया दोस्त. भगवान की दया से दो चाल और तिन टैक्सीया चलती है इस गरीब की मुंबई में. 55 साल पहले एक ख्वाब लेकर लखनऊ से यहाँ आया था बस भूक ने वो ख्वाब निगल डाला मायानगरी तो हमें रास नहीं आयी.. अभी कभीकभार ऐसे ही कलाकार होने की खुजली मिटा लेता हू " त्याच्या डोळ्यात कसलीतरी अभिजात अस्वस्थता दिसली... पिशवी सावरत तो पुढच्या स्टेशनवर उतरून गेला... त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत मला "सं.भा."च्या ओळी आठवल्या...
"उरात होती स्वप्ने आणिक
स्वरात होते गाणे
कुठे जायचे होते
आले कोठे पाय दिवाणे."

महेंद्र गौतम.
5 जून 2015.








All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected