लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

तू धूसर धुकेरी हसणारी.

तू धूसर धुकेरी हसणारी...

एक थेंब जरासा ओघळला
अन रात्र जराशी तळमळली
का दार जरासे किणकीणले
पण अधीर पापणी हिरमुसली.

तू शब्दांच्याही पलिकडली
तू धूसर धुकेरी हसणारी
तू असूनही का नसणारी
अन अदृश्यातून दिसणारी

ये विकल विव्हल या वाटेतून
जगण्याचे लक्तरं झाले गं
कर हृदयाचे या फूल पुन्हा
हे तनमन व्याकूळ ओले गं...

महेंद्र गौतम.

गोष्ट मुंबईची : मुंबई डायरी

गोष्ट मुंबईची

धुंदीत चालण आपल्याला आवडतं त्यातल्या त्यात जर डोक्यात एखादी गोष्ट वा ओळ रेंगाळत असली तर रस्ता कसा सरला कळत नाही..,

असाच क्रॉसिंगवरुन जात होतो, "भैय्या" असा आवाज समोरून कानी पडला चमकून पाहिल, विचित्र वेडंवाकड तोंड करत नी अटकत अटकत बोलत  "ती" मला म्हणाली "कानात हेडफोन टाकून चालू नको कधी पटरी  ओलांडतांना डावी उजवीकडं बघून जा बरं.."
हे सांगताना तिला कष्ट पडत होते विकलांग होती ती मला आठवल दोन दिवसां अगोदर एक तरुण कटला होता असाच कानात हेडफोन होता त्याच्या. मी मान हलवली तिच्याकड बघून हसलो ती निघून गेली. बाजूचा एक मिशाळ तुपाळ चेह-याचा माणूस मला म्हणाला " अर्धवट आहे ती, परवा एकजण कटला तिच्यासमोर तेंव्हापासून प्रत्येकाला असच सांगत सुटलिये.
मी म्हटलं बरोबर आहे राव इतरांना जपणारे, दुसऱ्यांच्या जीवाची काळजी करणारे माणसं अर्धवटच तर असतात हल्ली तुपाळ, मिशाळ मामा माझ्याकडं बघत राहिला. मी पळालो ०८:४५ मि. डोंबिवली पकडायची होती..,

-महेंद्र गौतम.


अनावरचा प्रकाशन समारंभ.

अनावर या माझ्या दिलीपराज प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेल्या दुसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. ऋषिकेश कांबळे सर आणि कविवर्य अभय दाणी.
23 जानेवारी 2015.
महेंद्र गौतम.

जरा विसावू या वळणावर

विसावा

आरिंग मिरींग 1

आता ऑटोतून उतरल्यावर पायाला लागतो तो चकचकीत पण रुक्ष सीमेंट रस्ता. पूर्वी गावच्या या वाटेवर ममताळू माती खेळायची आणि अनवाणी पायाने तिच्यावर हुंदडताना तिचा स्निग्ध स्पर्श हवाहवासा वाटायचा.
पाऊसकाळात चिखल व्हायचा थोडाबहूत मग याच वाटेवर एखादा टैक्टरभर मुरूम पडायचा गावच्या डोंगराचा ग्रामपंचायतकडून. आणि  रस्त्यावरुन फिरणाऱ्या अजस्त्र "दबईमागे" फिरतांना केव्हढा हुरूप यायचा तेंव्हा.
दोन्ही बाजूच्या नाल्या जोरदार पावसान स्वच्छ व्हायच्या आणि त्या भरून वाहणाऱ्या पाण्यात मग होड्यांची पैज लागायची; आता त्या मातीवर सीमेंट अंथरण्याचा कोडगेपणा चाललाय सगळीकडे. पायाला होणारा तो ओला वेल्हाळ स्पर्श हरवला, आणि कितीही पडलेला पाऊस निघून चालला, नालीवाटे,गावच्या ओढ्याच्या सोबतीने दूर कुठेतरी. त्याच जमिनीत मुरणच हरवल.
तेंव्हा हाताहातात मोबाईल नव्हते की 24 तासाच कार्टून नव्हतं होते ते मोकळ्या हवेतले जीव दमवून आनंद देणारे खेळ. मग ते चिंगाट पळत गावची गल्ली न गल्ली पालथी घालत खेळलेला चोर पोलीस असो की तास न तास चाललेला "ईस्टाप" असो. शाळा सुटल्या सुटल्या कसेबसे कपडे बदलून एका मोकळ्या जागेत सगळे भिडू जमत. मग सुरु होई जितनापातनीचा खेळ मध्येच थकवा घालवण्यासाठी "माझ्या मामाच पत्र हरवल"चा फेरा घडे.
अग्गल दुग्गल "चिपून" ठरायच. तिन तिन भिडू गोलाकार हात गुंफून उभे राहत जो "आला" तो अग्गल. सगळ कस फेअर.
जेवणं आटोपून अंधार पडला की बैठे खेळ सुरु व्हायचे.
"थापट मापट केली
दत्तान नेली
दत्त माझा भाऊ
सिंधीचा काटा
डोंगरवाटा
डोंगरातली भावली
वस्सकन धावली
धर रे बेट्या एकच कान."
मग एकमेकांचा कान धरून....
"चाऊ म्याउ घुगर्या खाऊ
काना काना कुर्र
चिमण्या गेल्या भुर्र....."
किंवा
"खार कबूतर डोली डस्टर पिंजर खार."
किंवा
आरिंग मिरिंग
लवंगा चिरिंग
चीरता चीरता
डूब डूब बाजा
गाई गोपी
उतरला राजा...
किंवा मुठीवर मुठ ठेऊन " एक आंबा पिकला एक आंबा गाभुळला" नाहीतर वितीवर वित ठेऊन "मह्या चिचिवर कोण हाय".... अस काहिबाही चालायच.
नंतर उद्याचा जुजबी अभ्यास आटपून म्हाताऱ्या मायच्या गोधडीत तिच्या उबदार थोपटन्यासहीत "नकट भूत, राकेस बडा बाकेस किंवा श्रावण साखळीची" कहानी ऐकत गुडूप झोपण.
उन्हाळा असला की अंगणोअंगणी खाटा पडायच्या. माय मग आभाळातल चार चांदण्यांच खटल दाखवायची तिच्या शेजारचे तिन चोर दिसायचे, माय म्हणायची "आभाळ लै खाली होत आधी एकदा एक म्हतारी रोजच्यासारखी सकाळी सकाळी उठून आंगण झाडू लागली अन आभाळ लागल फटकन तिच्या डोक्याला झाडता झाडता रागान तिन एक फडा दिला ठेऊन, तेंव्हापासून आभाळ गेल वर...."
कधी कधी बापूला आग्रह व्हायचा "बापू बापू काहाणी सांगा ना..."
त्या म्हाताऱ्या झुर्रीदार चेह-यावर एक प्रसन्न पण खट्याळ हसू उमटायच मग, "बर बर सांगू का कहानी?"
एकसाथ सगळे ओरडायचे "हौ$$$"
" कहानी कहानी कुच्च
ढुंगन गेल उच्च...."
की सगळे हसून हसून लोटपोट.......

महेंद्र गौतम.

माझी माणस.

पहिल्यांदा जेंव्हा त्याला भेटलो तेंव्हा लक्षात राहिले त्याचे स्निग्ध स्नेहाळ डोळे आणि बोलण्यातल मार्दव. तो बिग बी अमोल सारखा डॅशिंग नव्हता की विक्की भाई सारखा हरहुन्नरी कलाकार नव्हता पण होता एकदम कूल. मी फर्स्टला होतो तेंव्हा हा फाइनलला होता, मुळात आमचे सगळे सिनिअर्स खतरनाक होते, रॅगींग नव्हतं पण इंट्रो एव्हढा कडक होता की सांगता सोय नाही. पण तेच सिनीअर्स जातांना स्वतःच्या नोट्स कॅल्सी ड्राफ्टर ड्राइंग बोर्ड देऊन जात, अडचणीला धाउन येत. काही काही हलकट होते ते असो पण सिनीअर म्हटलं की टरकायची, "खाली मुंडी तीसरी गुंडीची" भीति वाटायची. स्कॉलरशिपचा मला काहीतरी प्रॉब्लम आलेला ह्याची साखरे बाबूसोबत चांगली घसट म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि आईशप्पथ सिनीअर्सबद्दलच माझं मत बदलल, तेंव्हापासून आतापर्यन्त हा माझे प्रॉब्लम्स सॉल्व करतोय.
म्हणजे फर्स्टला तापानं फणफणलो तेंव्हा सायकलवरुन मला कंदोई डॉक्टरकडे हाच घेऊन गेला (त्याने बसायच्या जागी लै जो-यात सुई दिली होती).अनावरच्या प्रकाशनाचा जास्तीत जास्त खर्च ह्यानेच उचलला. अगदी काल परवा उपाशीपोटी एन्डोस्कोपी झाल्यावर जेंव्हा ग्लानी आली तेंव्हा सावरायलासुद्धा हाच होता.
सुरवातीच्या माझ्या पाणचट कविता हा आवडीने वाचायचा कुणी वाचू नये म्हणून मी कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवायचो तरी हा बिनदिक्कत तिथेही लुडबुडायचा ह्यानेच मला डायरी दिली होती पहिल्यांदा.
एका स्थानिक दैनिकात  माझी "कातरवेळ" छापून आली होती तेंव्हा ह्याने मला मेहतामध्ये ट्रीट दिली 25 रूपयात भरपेट थाली होती तेंव्हा. खर सांगतो सिनेमाचा स्क्रीनप्ले ज्यादिवशी लॉक केला तेंव्हा खुशीत येऊन आमच्या प्रोड्यूसरने जबरदस्त पार्टी दिलेली पण वाशीममधल्या मेहताच्या थालीची चव काय नव्हती त्यात.
पण आयुष्यात खुप सोसल ह्याने परिस्थितिशी खुप झुंजला हा माणूस. एव्हढे दुःखाचे कढ पचवून कायम हसतमुख कस राहता येत ह्याला हे एक कोड मला कधी सुटल नाही.
विपरीत परिस्थितीत ताईने जिद्दीने शिकवल, डिप्लोमा पास झाल्या झाल्या
सरकारी नौकरीसुद्धा लागली आणि ती सांभाळून त्याने B.E. कम्पलीट केल तेंव्हाच्या जीवघेण्या कसरतीबद्दल त्याने मला लिहिल एकदा.
" आधार वाटाव अस सोबत कुणीच नव्हतं पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणणारं कुणीतरी असाव लागत रे".
BE झाल्यावर सुखासीन नौकरी सोडून हा बिजनेसमध्ये पडला आणि हात  पोळून घेतल्यावर M. Tech.करून प्राध्यापक झाला. आता जरा बरे दिवस आलेत बेट्याला अगदी कालपरवाच त्याचा साखरपुडाही झाला. भैताडाला बायको चांगली भेटलिये विशेष म्हणजे खुप समंजस आहे. खुप खुश होते दोघेही साखरपुड्यात. खुप दिवसानंतर ह्याला एव्हढ खुश पाहून फार बर वाटल.
आज त्याचा वाढदिवस "हजार बाराशे वर्ष जग दोस्ता."
शुभेच्छा रे.

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected