तुझ्या मायाळू स्पर्शाला
आसुसला माझा देह
ऊनकातर दुपारी
कसा जांभूळला डोह.
कधी चालत जातांना
पायांची गा थरथर
कसं पाऊल मी टेकू
धरा कायम अस्थिर.
कसा धुक्यातून येई
स्पर्श रेशमी रेशमी
करपल्या काळजाला
ओरखड्याचीच हमी
आत दुभंगल काही
जाण कोणालाच नाही
कसं सारखं वाटतं
मी तो उरलोच नाही
माझा ध्यास पतंगाचा
जातो खुशीनं जळाया
कुठं पेटलं सरण
लागे नभ उजळाया
नको विषारी आसरा
नाही कोणावर सक्ती
व्यथा पोखरे वाळवी
मिळो याच्यातून मुक्ती
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा