लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

मी तयार आहे.

उन्मत्त झुंबड गर्दीधारी बेगडी बाजारबुणगे
स्वतःच्या वर्चस्वाची टिमकी घेऊन सारसावणारे हात
चिक्क मांड्यातून स्रवणारा शितोष्ण लाल तळतळाट
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
जाणीवपूर्वक येत नाही सोयीच्या कानांच्या परिघात.
लिलावउद्युक्त बाजार जिंदगाण्या.
ऊब,ओल कालबाह्य असलं तत्सम काहीबाही,
हतबलतेची शिखंडी कारणं शोधणारी फुसकी व्यस्तता.

कुणाचं बोटं धरून उतरलो होतो
या गुढघनं काळीम डोहात?
शिरत गेलो गर्द गहिऱ्या खोलात,
अस्वस्थतेच्या टुचण्या मारणारा आचरट कावळा.

हे मौन तुला कळत नाही
मलाही ते पेलत नाही आताशा
फुटतं राहत उत्फुल्ल आत काही आदीम,

असहाय जीवांवर सुरे घेऊन धावणारा
मर्दउन्मादी चिरफाडी जमाव
डोळे मिटताच दिसतो मला मी
गुहेच्या तोंडाशी टोळीसोबत्यांन सोबत
पानं आणि साली लेऊन रक्तशिरबीड हातातोंडाने
खातांना दुसऱ्या टोळीतल्या माणसाचं चविष्ट मांस.

सांग कधी हवं होतं मला मोहरेदार
गारझुळूकसंपन्न मतलई आयुष्य?
फक्त दोन क्षणांसाठीच होऊ दे मला
आतून बाहेरून पारदर्शक...
मग उरलेलं सगळं आयुष्य मी फेकून द्यायला तयार आहे..

महेंद्र गौतम.

बाबा रिटायर होताना..

बाबा रिटायर होतांना..

तेंव्हा महिन्याची चार पाच तारीख असली की सकाळपासूनच बाबा आई मस्त
प्रसन्न असायचे, सकाळी आईला काहीतरी सांगून शीळ घालत,हातात किराण्याचा मोठा थैला घेऊन ते खुशीत ऑफिसला निघायचे. संध्याकाळी आईची लगबग सुरु असायची मसाल्याचा घमघमाट स्वयंपाक घरात घुमायचा, ज्वारीच्या कडक पांढऱ्या भाकऱ्या आई अन ताई खरपूस भाजून ठेवायच्या. मग सातच्या सुमाराला बाबाची एन्ट्री व्हायची एका हातात तेलाची मोठी किटली खांद्यावर भली मोठी पिशवी.
मी पळत जाऊन किटली घ्यायचो दादा खांद्यावरची पिशवी धरू लागायचा
बाबा पिशवीतलं मटण आधी आईच्या हाती सोपवायचे. मग फ्रेश होऊन तिघांना घेऊन बाबा बसायचे
माझ्या आवडती बालूशाही, बिकानेरचा शेवचिवडा, इमरती,केळी,किराण्यातले पेंडखजुर आंब्याचा सिझन असला तर आंबे.मस्त गोल कोंडाळ करून खायचो जाम खुशीचा दिवस असायचा. जेवण उरकलं की आई सोबत मिळून रात्री ते कसला तरी हिशेब करत बसायचे.
त्यावेळी घरात फार पैसा यायचा असंही नाही पण जे यायचे
त्यात सगळं खुशीत निभायचं ददात नव्हती कशाचीच. संध्याकाळी ऑफिसवरून
बाबा आले की सगळं कुटुंब कोंडाळ करून जेवायला बसायचं बाबा जामच कॉमेडी,
भारी गपीष्ट माणूस. आता पोटापाण्यासाठी या मेट्रोत धावतो तेंव्हा त्यांचं मोठेपण कळतं, फक्त 186 रुपयांनी नौकरी सुरु केलेली, (इथं मी चांगला पाच आकडी पगार कमावतो तरी महिन्याकाठी बजेट बोंबलतो) मी कधीतरी फोन करून विचारतो काहीच हातात नसतांना घर, तिघांचं शिक्षण , ताईच लग्न, नातवांची आजारपणं.तुम्ही कस काय मॅनेज केलं? त्यांचं फक्त एकच उत्तर,
तुला सोपं वाटतं लै हिशेबान रहावं लागतं बेट्या..
दोनेक वर्षाचा होतो तेंव्हा त्यांचा अपघात झाला पायांचा पार भुगा झालेला
चारदोन ऑपरेशन्स मग पायात रॉड, तरी ते खचले नाहीत जिद्दीनं उभे राहिले
पाय जरा जाग्यावर आल्यावर काही वर्षांनी उमरखेड वरून गावी शिफ्ट झालो तेंव्हा कितीतरी वर्ष त्यांनी
तब्बल पंधरा किलोमीटर रोज सायकल वरून अपडाउन केलं.
अपघातामुळं पण फार नुकसान झालं उत्तम ढोलकीपटु त्यामुळे भजनासाठी खूप वेळा बोलावणं यायचं
त्याच्यावर परिणाम झाला, स्वतःच कलापथक होत लोकांना तुफान हसवायचे कधी जेवताना एक एक किस्सा सांगतात त्या दिवसातला अन ठसका लागेस्तोवर हसतो सगळे. आताही कधी मुड झाला की संध्याकाळी ढोलकी काढतात मग आमच्या दोघांची मैफिल सुरु होते मी जमवून ठेवलेले लोकगीतं, गझला, भजनं, काही स्वतः लिहिलेली गाणी असा धांगडधिंगा सुरु असतो, ताल आमच्या खानदानात पहिले पासूनच आहे बापू पखवाज वाजवायचे बाबा ढोलकी आता दादासुद्धा छान ढोलकी वाजवतो पण बाबसारखं त्याला "तोडता" येत नाही मी गजल सुरु केली की तो लगेच ढेपाळतो याद पिया कि आये ला तर तो एकवेळ जामच वैतागला मग बाबा स्वतःच आले म्हणाले पाहू बरं किती अवघड गातो महिंद्रा,देरे जरा.
अन असं वाजवलं महाराजा की आपली विकेटच..!! बाप आहे बेट्या जोक समजला का..??
घरात कुणावर जबरदस्ती नाही,मध्ये उमेदीची सहा वर्षे मी नुसता भटकत राहिलो
कोरिओग्राफी केली , झपाटल्या सारखा वाचत राहिलो, गजलेचा पिच्छा पुरवला कविता कथा,लिहिल्या,शिवाय मनसोक्त भटकलो. सिनेमा लिहिला तो थोडंसं उत्पन्न देऊन गंडला मग औकातीवर येऊन गुपचूप जॉब जॉईन केला थोडीसी कुरकुर करायचे पोटाकडं बघ म्हणायचे नंतर कळलं की जे केलं ते त्यांनी आधीच केलं होतं त्या क्षेत्रातली अनिश्चितता त्यांना ठाऊक होती पण माझं बेदरकार असणं त्यांनी सोसलं
प्रसंगी जेव्हढा हवा तेवढा पैसाही पुरवला विनातक्रार.
माझ्या घरी आलेला प्रत्येक दोस्त त्यांचा दोस्त होतो माह्याचा बाप लै ढिंचाक माणूस राव म्हणतो.
कितीतरी मैत्रिणी त्यांना अजून कॉल करतात. आईपासून मी बऱ्याच गोष्टी लपवतो
पण बाबाला कितीही पर्सनल बोलता येतं. अनावरच्या प्रकाशनाला त्यांना बोलावलं
हृषीकेश कांबळे सारखा परखड समीक्षक, दासू सर सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं
तेंव्हा मात्र जरा हळवे झाले प्रोग्राम संपल्यावर निघताना फक्त म्हणाले
तुला जे करायचं ते तू करणारच कोणाच्या बापाचं ऐकणार नाहीस पण थोडी जबाबदारी घे आता
निदान स्वतःच तरी बघ आमचं सोड. आता महिन्याकाठी पैसे पाठवले काय
किंवा न पाठवले काय तक्रार नसते.
गेल्या वर्षी हौसेनं सहा एक हजाराच सफारीच कापड घेऊन गेलो तेंव्हा लहान मुलासारखं
हसले म्हटले लेकरं पटकन मोठे होतात.
काल नौकरीचा शेवटचा दिवस होता त्यांचा, जंगी सत्कार झाला
डिपार्टमेंटचे मोठे मोठे अधिकारी छान बोलले मला म्हणाले तू हवा होतास
एक हॉटेल बुक केलं होतं रे कार्यक्रमासाठी,महागडं सोनाटाचं घड्याळ दिलं. एकोनचाळीस वर्षे दोन महिने एकोणतीस दिवसाची सर्व्हिस झाली कोणाकडून तक्रार नाही कुणाचे पैसे खाल्ले नाहीत याच दिवसासाठी इमानदारीने काम केलं.
मी म्हटलं आता आराम करा संध्याकाळ एन्जॉय करा.
बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्यात अजून जस कोंबडी घरच्या घरी सोलणं, खेकडे फोडण साफ करण मासे नीट स्वच्छ करणं, बाजार करणं, एक नंबर मटण आणण, एका रेषेत प्लेन तावावर सुंदर लिहिणं,झपाटून जाऊन काम करणं, पटकन माणसात मिसळण आणि महत्वाचं म्हणजे प्रचंड तणावात कायम हसत राहणं.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा..!!

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected