चालत रहा, चालणं महत्वाचं. चालत राहिलास तर सोबत समस्या, संकटं, दुःख, वेदना आणि प्रश्न देखील चालतात. प्रश्न पडू दे उत्तरावर कामं कर. थांबू मात्र नकोस.
थांबलास तर सोबत हे सगळे आगंतुक पाहुणे पण थांबतील,
रेंगाळतील हल्ला करतील साचून राहतील आणि तुझा त्रास वाढेल.
तू गांगरशील, हताश होशील, नैराश्य दाटेल मग अवघड होईल, मुळात अवघड होऊच का द्यायचं?
त्यापेक्षा वाहत रहायचं हे उत्तम.
लहान मुलं एक पाऊल टाकत आपण हरखून जातो,
त्याला म्हणतो अजून एक अजून एक आणि ते दुडुदुडु धावायला लागतं ना?
तसंच हरखून जाता आलं पाहिजे लहान मुलं होता आलं पाहिजे.
जग नेहमीच तुझा बाजारभाव ठरवतं असतं, पाच सहा वर्षांपासून ते वीस बावीस वर्षांपर्यंत
तू शिक्षण घेतोस काय शिकवतात तुला? तर स्वतःला विकण्याची कला.
ऍपटीट्युड टेस्ट असते ना? आता हा बाजार अपरिहार्य आहे तो स्वीकार
त्यासाठी दिसणं आणि दाखवणं महत्वाचं म्हणजे तू लायक आहेस हे दिसलं पाहिजे, त्यापेक्षा ते तुला जाणीवपूर्वक दाखवता आलं पाहिजे त्यासाठी तू लायक असलंच पाहिजे असं काहीच नाही.
तू कोण आहेस? तर कोणीच नाहीस हे एक उत्तर आणि याहून खरं म्हणजे तू तो आहेस जो तू स्वतःला समजतोस..
#यात्रीक
#महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा