युद्ध कधीच संपलं नव्हतं
आणि हे युद्ध कधीच संपणार नाही कदाचित..
मित्रा, जिथे हक्कही दिल्या जातो
भीक दिल्याच्या अविर्भावात,
जिथला मारेकरी घालतो उघड हौदोस
जिथे खुनी निर्दोष सुटून फिरतात
उजळमाथ्याने राजाच्याच संमतीने.
जिथे पिडितांच्या उरातला उद्रेक उसळल्यावर
त्यांनाच डांबल्या जात तुरुंगात.
विचारांची लढाई विचारानं लढावी हे सर्वसंमत असतांना
जिथे शुद्ध तार्किक प्रतिवाद करणाऱ्याला
भ्याडपणे घातल्या जाते गोळी
जिथे खुन्याचं केलं जातं निर्लज्ज समर्थन
आणि सत्याचे पहारेकरीच आरोपींना पाठीशी घालत
निरपराधांची डोकी फोडतात
अश्या प्रदेशात युद्ध अटळ असतं.
इथे स्वखुशीने जन्मत नसतो
कुणी बागी मानसिंग किंवा तुकाराम वा ढसाळ
आणि आनंदाने भिरकावीत नसतो
कोणताच जब्या दगडसुद्धा.
युद्धातही असतो फरक
माझ्या प्रिय दांभिक,पक्षपाती
आणि सोईस्कर सहिष्णू असणाऱ्या पाखंडी मित्रा,
कुणी शोषणासाठी युद्ध करतं
तर कुणी शांततेने माणूस म्हणून जगायला मिळावं म्हणून.
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा